प्रधानमंत्री किसान समृध्दि केंद्रामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल : सुनिल गफाट यांचे प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये बी बियाणे, कीटकनाशके, खते व शेतीसाठी लागणारी अवजारे या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असे प्रतिपादन वर्धा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी केले. ते पंचायत समिती आष्टी येथे आयोजित प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र समर्पण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर नायब तहसीलदार काळुसे साहेब, तालुका कृषी अधिकारी साळे साहेब उपस्थित होते.
गफाट पुढे बोलताना म्हणाले गत नऊ वर्षापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी केंद्र मानून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अकरा कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये सहाय्य केंद्र सरकार देत असते. याच योजनेच्या माध्यमातून आज नरेंद्र मोदी यांनी १४ वी किस्त शेतकऱ्यांना वितरित केली. सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील गफाट यांनी शेवटी केले.
कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर, वर्धा जिल्हा भाजपा सचिव सचिन होले, अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक विजयकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
News - Wardha