महत्वाच्या बातम्या

 उल्लेखनिय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस २.५० लाखाचा पुरस्कार


-  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ३ हजार शिष्यवृत्ती
- शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व गुणवत्ता पुरस्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थी केवळ आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व गुणवत्ता पुरस्कार या दोन योजनेने विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण सोडविली असून पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे काम केले आहे.  

अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधरावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत, यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. इयत्ता १० वी मध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी ही योजना लागू आहे.

ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींना दिली जाते. विद्यार्थ्यांना दहा महिन्यांकरीता दरमहा ३०० रुपये याप्रमाणे संपुर्ण वर्षभरासाठी ३ इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात.
इयत्ता दहावी व बारावीत विशेष उल्लेखनिय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास २ लाख ५० हजार रुपयांचा हा पुरस्कार दिला जातो.

सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्डामधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस 1 लाख, प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास ५० हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस १० हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधून इयत्ता १ वी व १२ वी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास ५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

उच्च शिक्षणासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती : 
देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना राबविली जाते. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयापर्यंत असावे. विद्यार्थी राज्य शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.

वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार :
इयत्ता दहावी व बारावीमध्ये राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार दिला जातो. दहावीत राज्यात प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रत्येकी एक लाख, दहावीच्या परीक्षेत विभागीय बोर्डात प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रत्येकी ५१ हजार व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी ५१ हजार रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.





  Print






News - Wardha




Related Photos