अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश आमंत्रित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ वसतीगृहे कार्यरत आहे. वसतीगृहांमध्ये एकुण १ हजार १५५ विद्यार्थी प्रवेश क्षमता असून यातील रिक्त असलेल्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ७ मुलांचे व ५ मुलींचे वसतीगृह कार्यरत असून वर्धा प्रकल्पातील विभागीय स्तरावरील वसतीगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय ते पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता आणि तालुकास्तरीय वसतीगृहामध्ये इयत्ता ८ ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निकाल लागल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता तथा नियमानुसार करण्यात येईल. वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा वसतीगृहात प्रवेश होणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेत वसतीगृह प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर वळती करण्यात येणार आहे. परंतु त्याकरीता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करतांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना पर्याय निवड करणे अनिवार्य आहे.असे न केल्यास विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासुन वंचित राहिल्यास स्वत: जबाबदार राहील.
जिल्ह्यात वर्धा येथे मुला-मुलींचे ४, आर्वी येथे मुला-मुलींचे २, कारंजा येथे २, हिंगणघाट येथे २, आष्टी व सेलू येथे मुलांचे प्रत्येकी १ असे एकुण १२ वसतीगृहे आहेत. प्रवेश प्रक्रिये संबंधी अधिक माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे, असे कार्यालयाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha