धुळ्यातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना अपघातांचा विळखा : चार वर्षांत ८८७ अपघात तर २७८ मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / धुळे : आधी समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला अपघात यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या चार वर्षांत ८८७ अपघात झाले आहेत. २७८ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत, असा सूर आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याला कारण आहे वाढती अपघातांची संख्या. मागील शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेला बसचा भीषण अपघात आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला कंटेनरचा भीषण अपघात यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. वाढती अपघातांची संख्या ही सध्या चिंतेची बाब आहे.
धुळे जिल्ह्यातून मुंबई-आग्रा आणि नागपूर-सूरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या दोन महामार्गांवरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते, शहरांसह जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या, महामार्गावरून वाहन चालविताना होणारे नियमांचे उल्लंघन ही वारंवार अपघात होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही महामार्गांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, धुळे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तब्बल ८८७ अपघात झाले असून २७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी १८ ठिकाणे अशी आहेत की, तिथे सातत्याने अपघात होतात. मात्र या ब्लॅक स्पॉट समजला जाणाऱ्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, सूरत नागपूर महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असली तरी दुसरीकडे मात्र होणाऱ्या अपघातांची संख्या अफाट असल्याने हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर झालेला भीषण अपघात -
धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झालेला. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला होता. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले होते. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
News - Rajy