महत्वाच्या बातम्या

 दुर्घटना झाली तेव्हा बस ओव्हरटेक लेनमधून धावत होती : बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / बुलढाणा : समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झालेत.

शनिवारी झालेल्या बस अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता याच अपघाताचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस संदर्भात फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आला आहे.. फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

फॉरेन्सिक अहवाल -

अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे. अपघाताच्या वेळी बसची गती ७० ते ८० किलोमीटर प्रति तास होती. अपघातग्रस्त बसचे समोरचे चाक सुरुवातीला साईन बोर्डला धडकले. त्यानंतर बस दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मागील टायर फुटला टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आली. बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन उलटली. बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाला आणि डिझेल टँकवर आदळला. त्यामुळे डिझेल टँकमधले ३५० लिटर डिझेल सर्वत्र सांडले डिझेल इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि बसने पेट घेतला. वाहतुकीचे नियम मोडून ही बस धावत होती. खरे तर वाहतुकीचे नियम मोडण्याचा एक विक्रमच या बसच्या नावे आहे.

बसवर नियम मोडण्याचा विक्रम -

- ५ फेब्रुवारी २०२१ पीयुसीचा कालावधी संपल्याने १ हजार २०० रुपयांचा दंड

- २४ ऑगस्ट २०२२- बसचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, अयोग्य लाईटचा वापर करणे यासाठी ४ हजार ५०० रुपयांचा दंड

- ११ ऑक्टोबर २०२२ - बसच्या फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याने २३ हजार ५०० रुपये दंड

- अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने ५०० रुपये दंड

- आपात्कालीनद्वार काम करत नसल्याने २ हजार रुपये, ड्रायव्हर समोरची काच फुटल्याने ५००० रुपये दंड

- जानेवारी २०२३ मध्ये नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याने ५०० रुपयांचा दंड

- १२ जून २०२३ - क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, बसच्या विंडोची काच फुटलेली असणे, बस मध्येच कुठेही थांबवणे. 

अशा विविध नियमांच्या उल्लंघन प्रकरणी ११ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या बसच्या नावे गेल्या तीन वर्षात ४५ हजारांहून अधिकची चलने फाडण्यात आली आहेत. जो दंड तीन वर्षात भरला नाही तो दंड बसचे जळून सांगाडे झाल्यावर भरण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळेचहा अपघात घडला का? असाही सवाल उपस्थित होतोय. वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बसला तेव्हाच कारवाईचा ब्रेक लावला असता तर कदाचित त्या २५ जणांचा जीव वाचला असता.





  Print






News - Rajy




Related Photos