बल्लारपूर : हत्या करणाऱ्या आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी
- सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्याची खळबळजनक घटना काल घडली. परिसरात दहशत पसरवणाऱ्या दीपक रामआसरे कैथवास वय 28 वर्ष या याला चार आरोपीने त्याचे डोके दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी रात्रीचे दिड ते 2 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपींनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले, हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपी तरुणांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
28 वर्षीय दीपक रामआसरे कैथवास याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, लोकांना त्रास देणे, ये-जा करणाऱ्यांकडून पैसे हिसकावणे, मारहाण करून दहशत पसरवणे, लहान मुलांना त्रास देणे हे त्याचे रोजचे काम होते. परिसरात सर्वसामान्य लोक त्याला घाबरत होते, काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मयत दीपकने परिसरातील गौरव राजु लीडबे याला मारहाण केली आणि धमकावले, याची माहिती तरुणांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृत दीपकला बोलावून घेतले. पोलिस ठाण्यात त्याला पोलिसांनी धाक समज दिली. पण पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच त्याने पुन्हा दोन्ही गौरव व अर्जुन राजू कैथवास तरुणांना पकडून पोलिसांत तक्रार का केली ? म्हणून त्यांच्या सोबत वाद केले. त्याच्या दहशतीला कंटाळून परिसरातील तरुणांनी संतप्त होऊन दीपक कैथवासची हत्या केली. प्रथम परिसरातील तरुणांनी दीपक कैथवासचा पाठलाग करून त्याला निर्जनस्थळी पकडले आणि त्याच्या डोक्यात दगडाने अनेक वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी तरुणांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी अर्जुन राजू कैथवास वय 28 वर्ष, प्रथम शंकर पाटील वय 25 वर्ष, गौरव राजु लीडबे वय 22 वर्ष तिघे ही मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर असून अमन दुसखोर कैथवास वय 20 वर्ष रा. बुध्द नगर वार्ड यांना अटक करून हत्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साखरे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.
टेकडी विभागात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी :
बल्लारपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व टेकडी विभागात पोलीस चौकी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथे गुंडगिरी आणि दहशतवाद खूप वाढला आहे. गुन्हेगारी प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवा रोड परिसरात पोलीस चौकीची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
News - Chandrapur