पावती घेऊन खरेदी केलेल्या अधिकृत बियाण्यांचीच लागवड करा
- कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
- बोगस बियाण्यांवर विभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कृषि विभागाच्यावतीने बोगस बियाण्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर तपासणी सत्र राबविण्यात येत आहे. या मोहिमेत कापसाचे बोगस बियाणे आढळून येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाचे बियाणे खरेदी करतांना अधिकृत केंद्रातून पावती घेऊनच खरेदी करावे व अशाच बियाण्यांची लागवड करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
बोगस बियाण्यांच्याबाबतीत कृषि विभाग कारवाई करत आहे. या कारवाईत बोगस कापुस बियाणे ठिकठिकाणी आढळून आले आहे. बोगस बियाणे पावतीशिवाय विकले जाते. अशा बियाण्यांची खरेदी करून पेरणी करणे नुकसानदायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावती शिवाय विकल्या जात असलेले बियाणे खरेदी करू नये. अधिकृत केंद्रावरून कापुस बियाणे खरेदी करून त्यांची पावती घ्यावी. पावती असलेलेच बियाणे लागवड करावे.
ज्या कृषि केंद्र धारकाकडून कापसाचे स्वस्त दरात बियाणे उपलब्ध झाले आहे. त्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विना पावतीचे किंवा स्वस्त दरात बियाणे विकले जात असल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागास संपर्क साधावा. यासाठी कृषि विभागाच्यावतीने स्वतंत्र कार्यालयीन दुरध्वनी व व्हाट्सॲपसह मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना बियाण्यांच्याबाबतीत काही तक्रार, शंका असल्यास त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांचा मोबाईल क्रमांक 94221 33744 व कार्यालय दुरध्वनी 07152-243374, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे 94228 42245, कार्यालय दुरध्वनी 07152-250099, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी परमेश्वर घायतिडक 75173 66933 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.
News - Wardha