गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान : जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम
- येनकापल्ली येथे गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : जिल्ह्यातील तलाव व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या तलावामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास तलावांची मूळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येनकापल्ली येथे मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत झालेल्या गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते. यावेळी नागेपल्ली चे ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार, लक्ष्मण येर्रावार, किरण खोब्रागडे, आनंद दहागावकर, पंकज नौनूरवार, पेसा अध्यक्ष किसन सिडाम, संजय मेडपल्लीवार, सतु मेडपल्लीवार, नरेंद्र मडावी, सुरेश आत्राम, संन्याशी मडावी, सदाशिव कुमराम, कलम शाही आत्राम, भगवान आलम, बिच्चू कुमराम, साईनाथ आत्राम, तुकाराम आत्राम, दिनेश कुमराम, गणेश वड्डे, सिद्धेश्वर मडावी, महेश आलाम, नागेश आत्राम, सागर आत्राम, मधुकर कुमराम, सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शासकीय यंत्रणा आणि अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यास आणि गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी होऊ शकते असेही भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.
एवढेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ टाकून पिकांची उत्पादकता वाढवायची आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज करून गाळ मागणीची नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
News - Gadchiroli