महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रमध्ये ४ हजार ६२५ जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : ज्या उमेदवारांना शासकीय नोकरी करायची आहे आणि जे लोक तलाठी भरतीची वाट पाहत आहेत, अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तलाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाकडून या पदाच्या नोकरीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ४ हजार ६२५ पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

४३ विविध खात्यांतर्गत भरती होणार : तलाठी हा एक महसूल अधिकारी असतो, जो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी तसेच सर्वेक्षण करण्याचे जबाबदार असतो. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या तलाठी भरतीसाठी राज्य सरकारने अखेर आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता राज्यात ४ हजार ६२५ जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने यावर्षी जून ते १५ ऑगस्ट दरम्यान हजारो रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४३ विविध खात्यांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट पूर्वी ही पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे.

तलाठी पदासाठी आदेश जारी : राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने याबाबतचा एक आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील रिक्त असलेल्या ४ हजार ६२५ तलाठी पदांच्या जागा येत्या १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी क- संवर्गातील ४ हजार ६२५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भरतीसाठी कसा करावा अर्ज? : तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून भरायचे आहेत. याबाबतची जाहिरात

शासनाच्या या https://mahabhumi.gov.in/mahabhumilin लिंक वर उपलब्ध आहे. ही जाहिरात महसूल विभागाचे सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान भरतीची पदसंख्या आणि आरक्षणाची संख्या याच्यात बदल होऊ शकतो. तसे झाल्यास त्याची माहितीही वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कशी होणार निवडणूक प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राज्यस्तरावरून एकत्रितरित्या परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी संवर्गाची यादी तयार करताना संबंधित जिल्ह्यात आवश्यक असलेल्या पदांचा विचार करुनच प्रत्येक जिल्ह्याची जिल्हानिहाय स्वतंत्र निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज केलेला जिल्हा आणि त्यांना मिळालेले गुण हे त्या त्या जिल्ह्यातील यादीनुसारच गृहीत धरले जातील. सदर उमेदवाराचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना उपविभाग नेमून नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारने प्रक्रिया लवकर राबवावी कुलथे : दरम्यान, तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्य सरकारने ज्याप्रमाणे आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावीत. त्यामुळे सरकारमध्ये असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन जनतेला अधिकाधिक सुविधा मिळतील. त्यासाठी सरकारने आता वेळ न दवडता भरती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस गदी कुलथे यांनी केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos