चला जाणूया नदीला अभियानांतर्गत आजपासून यशोदा नदी संवाद यात्रा
- नदी काठावरील गावांची परिक्रमा करणार
- गावकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य नद्या स्वच्छ, सुंदर व अमृत वाहिणी बनविण्यासाठी चला जाणूया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश आहे. धाम व वणा नदीनंतर आता जिल्ह्यातील यशोदा या तिसऱ्या नदीची संवाद यात्रा उद्या ३० मे पासून आर्वी तालुक्यातील बोरी बारा येथून सुरु होत आहे.
यशोदा नदी संवाद यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा समन्वय समितीतील शासकीय सदस्यांसह जिल्ह्यातील नद्यांचे समन्वयक तथा जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, भरत महोदय, सुनील रहाने, यशोदा नदीच्या संवाद यात्रेची जबाबदारी असलेले कमलनयन बजाज फाऊंडेशनचे क्षेत्रिय कार्यक्रम प्रबंधक महेंद्र फाटे यांच्या विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी गावातील सरपंच, गावकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
चला जाणूया नदीला हे अभियान विविध उद्देशाने राबविण्यात येत आहे. नदीला स्वच्छ, सुंदर करण्यासोबतच तिला तिचे मुळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी हे अभियान महत्वाची भूमिका पार पाडत आहे. यासोबतच जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वंकष उभ्यास व प्रचार प्रसार करणे, नदींना अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत प्रचार प्रसार नियोजन करणे, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पुररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याची माहिती या यात्रेदरम्यान संकलित केली जाणार आहे.
याशिवाय पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजलस्तर उंचावण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा देखील अभ्यास यात्रेदरम्यान केला जाणार आहे. नदीमध्ये अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास देखील केला जाणार आहे. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा महत्वाची ठरणार आहे. नदी काठावरील आर्वी, वर्धा, देवळी व हिंगणघाट तालुक्यातील गावांची ही यात्रा परिक्रमा करणार आहे. या यात्रेत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्तरावरील कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Wardha