बल्लारपूर : विसापूर मध्ये पाण्यासाठी हाहाकार, नागरिक हैराण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व लोकसंख्येने जास्त असलेली विसापूर येथे मागील पाच सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
कूपनलिकेवर (बोअरिंग) जाऊन तप्त उन्हात त्यांना पाणी भरावे लागत आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
नदीवरील बांध काही समाजकंटकांनी तोडल्यामुळे प्रवाहाची धार वळल्यामुळे पंप हाउसपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने कुत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली व त्यामुळे मागील सहा दिवसांपासून विसापूर येथील पाणीपुरवठा खंडित आहे.
त्यामुळे आपली मोलमजुरीची कामे सोडून नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कूपनलिकेतून स्वच्छ पाणी येत नसल्याने पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.
पाच सहा दिवसांपासून विसापूर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा बंद पडलेला आहे. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेचे पूर्व-नियोजन नसल्यामुळे वारंवार पाणीपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे विसापूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे असे प्रितम पाटणकर, सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस यांनी म्हंटले आहे.
News - Chandrapur