गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार योजनेवर फोकस करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
- जिल्हाधिकाऱ्यांकडून जलसंधारण योजनांचा आढावा
- जून अखेरपर्यंत जास्तीत जास्त कामे करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवाय योजना राबविण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे यंत्रणांनी येत्या जून अखेरपर्यंत या योजनांमधून जास्तीत जास्त कामे होतील, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंधारण योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन गुप्ता, निम्न वर्धाचे कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे, सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत मंजूर कामे, सुरु झालेली कामे व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात या योजनांमधून कामे करण्यासाठी अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर कामांना ब्रेक लागेल. त्यामुळे जून अखेर पर्यंत जास्तीत जास्त कामे करा. येत्या काही दिवसात या कामांवरच अधिक लक्ष केंद्रीत करा. जिल्ह्यात या योजनांमधून चांगले काम झाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून गाळ काढून धरणातील पाणीधारण क्षमता वाढविणे व शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ विनामुल्य उपलब्ध करून दिला जाते आहे. विशेष म्हणजे अशासकीय संस्थेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना धरणातील गाळ काढून दिला जात असून गाळ नेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान देखील उपलब्ध करून दिले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेत अधिक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विभागांसह अशासकीय संस्थांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
News - Wardha