प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा : आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश
- अहेरी येथे वार्षिक आमसभा संपन्न
- आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यात विविध विभागात नागरिकांचे अनेक समस्या असून बरेच कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा, असे निर्देश माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आश्रम यांनी दिले आहे.
अहेरी मुख्यालयातील इंडियन फंक्शन हॉल येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऋतुराज हलगेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, माजी जि. प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, ग्रा. प. सदस्य मलरेड्डी येमनूरवार, राकॉचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार, नायब तहसीलदार फारुख शेख, पोलीस उपनिरीक्षक जिजा गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सर्वसाधारण जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठीच शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना दहा वेळा कार्यालयीन चकरा मारावे लागत आहे. यापुढे कुठलेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात हाय काय केल्यास ते खपवून घेतला जाणार नाही. तसेच वार्षिक आमसभेत सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे दिलेल्या मुदतीत निराकरण न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
फेब्रुवारी महिन्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी विधानसभेतील मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात वार्षिक आमसभा संपन्न झाली. मात्र काही कारणास्तव अहेरी तालुक्याची वार्षिक आमसभा (बुधवारी) 12 एप्रिल रोजी घेण्यात आली. या वार्षिक आमसभेत विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी सरपंच, उपसरपंच आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विषयावर गाजली वार्षिक आमसभा
वार्षिक आम सभेला सुरुवात होताच आमदार धर्मरावा आत्राम यांनी प्रथमतः अहेरी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या नागरिकांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर मागील वार्षिक आमसभेत घेण्यात आलेल्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यात बरेच मुद्दे निकाली काढण्यात आले नसल्याने आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यात प्रामुख्याने घरकुल, शौचालय बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अतिक्रम, विविध विभागातील रिक्तपदे, खेड्यापाड्यातील बसफेऱ्या, सिंचन विहीर आदी मुद्यांवर वार्षिक आमसभा चांगलीच गाजली. एवढेच नव्हे तर उपस्थित नागरिकांनी विविध प्रलंबित कामाबाबत थेट अधिकाऱ्यांना वार्षिक आमसभेतून विचारणा केली.
News - Gadchiroli