महत्वाच्या बातम्या

 मूल येथील सावरकर गौरव यात्रेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना इशारा


- राष्ट्रभक्तों का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रभक्तों का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा देत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. भविष्यात कुणी सावरकरांचा अपमान केला तर त्याला भारतातील जनता धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

मूल येथे आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा सरचिटणीस नामदेव डाहुले, महिला अध्यक्ष अल्का आत्राम, पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष देवतळे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदु रणदिवे, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत समर्थ, रेणुका दुधे, योगिता पिंपरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, सावरकरांवर विनाकारण टीका करणाऱ्यांचा मेंदू आणि बुद्धी ठीक व्हावी अशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रार्थना करतो. केवळ दाढी वाढविल्याने कुणालाही पंतप्रधान होता येत नाही. त्यासाठी त्याग आणि बलिदान आवश्यक आहे. शिवाय मेंदूचा विकास झालेला असावा लागतो. राष्ट्रभक्तीची भावना जागरूक ठेवावी लागते. संपूर्ण देशात जात-पात-धर्म विसरून स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांना अभिवादन केले जाते. परंतु काही लोकांना हे बलिदान दिसत नाही. ते सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिका करीत असतात, या शब्दांत त्यांनी विरोधकांवर टिका केली. सावरकर हे जगातले एकमेव स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांना मातृभूमीसाठी लढताना दोनवेळा जन्मठेप ठोठावण्यात आली. या शिक्षेमध्ये अमानुष अत्याचार सावरकरांवर करण्यात आलेत. हे अन्याय आजच्या युगात कुणीही सहन करू शकत नाही. एवढा त्रास सहन करूनही सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे कुटुंब हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही भाऊ देखील स्वातंत्र्यलढ्यात उतरले होते, याची आठवण मंत्री मुनगंटीवार यांनी करून दिले. सावरकर एकमेव असे व्यक्ती होते ज्यांच्या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच दोन देशांमध्ये बंदी लादण्यात आली. त्यामुळे ब्रिटिश सावरकरांना घाबरायचे. अशा सावरकरांचा अपमान मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

म्हणून सावरकर गौरव यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान इंग्रजांची सेवा घेणाऱ्या इटलीकर घराण्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहे. त्यामुळे सावकारांविरोधात बोलणाऱ्यांचे डोके आणि बुद्धी भ्रष्ट झाले आहे. भ्रष्ट डोके ठिकाणावर आणण्यासाठीच सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे, या शब्दांत मंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

फाळणीचे पाप

देशाची फाळणी हे काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी जाती-जातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केले. हिंदुस्थानाचे तुकडे केले. त्यानंतरही राहुल गांधी कोणत्या तोंडाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करतात? असा सवाल मंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos