गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या
- जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे आ. डॉ. देवराव होळी यांची मागणी
- गैर आदिवासी समाजाला पट्ट्यासाठी असणारी ३ पिढ्यांची अट रद्द करणे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई, प्रलंबित सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी
लोड शेडिंग बंद करणे, चामोर्शी येथील बस स्थानकाला निधी उपलब्ध करून देणे, वाघाचा बंदोबस्त यासारख्या विविध समस्यांवर वेधले लक्ष
- जिल्ह्यातील विकास कामाबाबत निधी मागणीचे पत्र देऊन निधी उपलब्ध करून देण्याची केली विनंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांकरिता जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचेकडे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत केली.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर पालकमंत्री महोदय यांचे लक्षही वेधले.
बैठकीला खासदार अशोक नेते, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, नागपूर विभागाचे पोलिस संचालक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांचे सह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी देवेंद्र जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत लक्ष वेधले गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून गैर आदिवासी समाजाला जमिनीचे पट्टे मिळालेले नाही. त्यामुळे ते अजूनही अतिक्रमण धारक म्हणून गणले जातात. परिणामी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अतिक्रमणधारक म्हणून त्यांना अपात्र केले जाते. त्यामुळे त्यांच्या जमिनीचे पट्ट्यासाठी असणारी ३ पिढ्याची जाचक अट रद्द करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील ३ वेळा महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यातच अतिवृष्टीच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना या मदतीपासून वगळण्यात आले. ९ जिल्ह्यांमध्ये घोषित केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
चामोर्शी तालुक्यातील २४ गावातील शेतकऱ्यांना लोड शेडिंग मुळे शेतीला पाणीपुरवठा थांबलेला आहे. किमान धान्याची फसल अंतिम टप्प्यात असल्याने या ठिकाणी लोड शेडींग थांबवण्यात यावा अशी मागणी केली.
चामोर्शी येथील बस स्थानक करिता तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी त्यांनी यावेळी केली.
मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला असल्याने वाघाचा बंदोबस्त करावाच ,परंतु शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शेतीला तारेचे कंपावन डीपीसी अंतर्गत मंजूर करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
News - Gadchiroli