आदर्श गाव संकल्पनेबाबत पद्मश्री पोपटराव पवार यांचे शेतकरी व सरपंचांना मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मिशन जयकिसान अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथील राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी आदर्श गाव संकल्पनेबाबत शेतकरी व सरपंचांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मनुसंधान भू - वैकुंठ अड्याळ टेकडीचे विश्वस्त मधुकर तुंडूळवार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शिंदे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शिवदास कोरे, तसेच सरपंच व शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
पोपटराव पवार यांनी, गावाच्या विकासासाठी पैसाच महत्वाचा नसून सर्व भेदभाव सोडून एकजुटीने, स्वयंप्रेरनेने एकत्र येऊन प्रयत्न केले तर आदर्श गाव निर्मिती होऊ शकते. तसेच गावांचा विकास पैशातून कमी व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून शास्वत, आनंददायी व सर्वांगीण होण्याची खात्री आहे. पाण्याचे नियोजन, पीक बदल, खतांचा कार्यक्षम वापर, शेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील प्रत्येक कामाची गुणवत्ता राखण्याचे पवित्र काम आपल्या हातून घडावे, असे त्यांनी सर्व सरपंच, ग्रामस्थ यांना आवाहन केले. गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय करून गोरगरिबांचा मेहनतीचा व घामाचा पैसा मुलाबाळांच्या विकासासाठी लावणे आवश्यक आहे. त्यातून गावात शांतता व सलोखा निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
News - Chandrapur