शेतकऱ्यांनी पिक पद्धतीमध्ये विविधता आणावी : राहुल कर्डिले
- स्ट्रॉबेरी शेती विषयक कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांनी आपल्या पारंपारीक पिक पध्दतीत बदल करावा. नियमित पिकांसोबतच नवनवीन पिकांना आत्मसात करावे. स्ट्रॅाबेरी सारखे पिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे. समृध्दी महामार्गाद्वारे अशी पिके थेट मुंबईला पाठविता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विकास भवन येथे स्ट्रॉबेरी पिका विषयी शेतकरी जागृकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत, कृषि भूषण शेतकरी दिलीप अलोणे, उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी अमृतलाल व्यास, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महेश पाटील, स्ट्राबेरी मार्गदर्शक दिलीप देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिलीप देशमुख आणि महेश पाटील यांचे अभिनंदन केले. जे शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादन करण्यास तयार आहे त्यांच्यासाठी प्रसासनाच्या वतीने विशेष प्रोत्साहन निधी आणि पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. नाविन्यपूर्ण पिक म्हणुन स्ट्रॉबेरी पिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे जेणेकरुन या पिकाच्या मालास समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई पर्यंत पोहोचविले जाईल व शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी दिलीप देशमुख यांनी स्ट्रॉबेरी शेती आणि त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. महेश पाटील यांनी त्यांचे अनुभव सांगितले. डॉ. जीवन कतोरे आणि अजय राऊत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी प्रसाशनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
News - Wardha