महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा


- सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

- नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात १६ ते १९ मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  १६५ व १७ मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे. 

गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी  सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार, १६ मार्च व शुक्रवार १७ मार्च रोजी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)  देण्यात आला आहे. त्यासोबतच १६ ते १९ मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार १७ मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे‍ शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दुरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची  हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन श्रीमती बिदरी यांनी केले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos