बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देणार : मंत्री उदय सामंत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत शिवडी ते न्हावाशेवा या २२ कि. मी. लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेतला आहे. सदर मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या समुद्रातील सुमारे १६ कि.मी. लांबीच्या बांधकामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील अंदाजे ७५० मी. अंतरा पर्यंतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जायका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रकल्प अभ्यासातून निदर्शनास आले. त्यानुषंगाने बाधित होणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण ठरविण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
याबाबत विधानसभा सदस्य महेश बालदी यांनी लक्षवेधी मांडली होती. मंत्री सामंत म्हणाले, पात्र अर्जापैकी 6525 पात्र लाभार्थींना नुकसान भरपाई देण्याकरता एमएमआरडीएद्वारे 190.60 कोटी इतकी रक्कम पात्र लाभार्थींना 60 :20 :20 या प्रमाणात वितरित करावयाची आहे. त्यानुसार 4116 लाभार्थींना शंभर टक्के तर १७५७ लाभार्थींना पहिल्या टप्प्यात ६० % अशा एकूण 5873 लाभार्थींना बँक खात्यात डीबीटी द्वारे 172.41 कोटी इतकी रक्कम वितरित केली असून उर्वरित रक्कम वितरित करावयाची कार्यवाही चालू असल्याचे सामंत यांनी सांगितले.
एम एम आर डी ए व सिडको यांच्या ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधकामामुळे प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये विकास कामे हाती घेण्याबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत गव्हाण व न्हावा गावातील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सुविधा व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी पाच कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो सात कोटी देण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. या चर्चेत विधानसभा सदस्य अस्लम शेख,अजय चौधरी, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
News - Rajy