महत्वाच्या बातम्या

 कृषी पंपाना २४ तास वीज पुरवठा करा : अन्यथा जेल भरो आंदोलन


- देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे उर्जा विभागाच्या महाव्यवस्थपकीय संचालकांकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये नैसर्गिक आपत्ती व रोगराईमुळे पुर्णता धान पिक नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडुन व बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे दुरापास्त झाले आहे. तो खर्च भरून निघावा म्हणून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे. माञ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना भारनियमन करून फक्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने धान पिक करपु लागले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी पुरते बरबाद होण्याची दाट शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना येत्या तीन दिवसाच्या आत २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा विरोधात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी देसाईगंजच्या महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्या मार्फतिने उर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवलेल्या निवेदनातुन दिला आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणविस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अनेकदा आंदोलन करून विधानसभेचे कामकाज थांबविण्यास भाग पाडले होते. सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवठा करून थकीत वीजबील माफ करण्याचे सुतोवाच केले होते. एवढेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करून तत्कालीन सरकार शेतकरी विरोधी असल्याच्या घोषणा देत जाहिर निषेध करत आमचे सरकार आल्यास २४ तास वीज पुरवठा करण्याचे आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासीत केले होते.

दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन होऊन राज्यात शिंदे फडणविस सरकार येऊन सहा महिण्याच्या वर कालावधी लोटला असुन तत्कालीन स्थितीत कृषी पंपाना १२ तास वीज पुरवठा करण्यात येत असताना लोडशेडिंग करून राञीच्या वेळी ८ तास वीज पुरवठ्याचा तुघलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. हा निर्णय अतिशय अन्याय कारक असुन उभे धान पिक करपु लागल्याने शेतकरी पुरते बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपाना दिलेल्या आश्वासना नुसार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सुरळीत २४ तास वीज पुरवठा करावा, अन्यथा विरोधात १६ मार्च २०२३ रोजी देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर स्थित कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहणार असल्याचे म्हटले आहे. निवेदन सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके, नंदु नरोटे, नितीन राऊत, पिंकु बावणे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असुन निवेदन देसाईगंज वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संतोष बागडे यांनी स्विकारले. यावेळी मनोज ढोरे, चैतनदास चंदनबटवे, अभय बुद्धे, महेश भरणे, विनायक वाघाडे, जगदीश शेंद्रे, समिता नंदेश्वर आदी शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos