ध्येयाने प्रेरित होऊन आजच्या पिढीने पुढे यावे : लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या उषाकिरण आत्राम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कुरखेडा : येथील 2 मार्च 2023 ला राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र, येरंडी येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वर्धापन दिनी केलेले प्रतिपादन हा कार्यक्रम संस्थेच्या 39 व्या वर्धापन दिनाच्या अनुसंगाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उषाकिरण आत्राम, लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व निवृत्त शासकीय अधिकारी, मिलिंद बोकील लेखक व सामाजिक कार्यकर्ते तसेच डॉ. सुरेश सावंत लेखक व सामाजिक कार्यकर्ते मुंबई तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, संस्थापक सदस्य शुभदा देशमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना गडचिरोली जिल्हा असा आहे की, त्यामध्ये उपजीविका रोजगाराची समस्या असून तसेच वनउपज यावर रोजगाराची निर्मिती करून आपली उपजीविका सोबतच आदिवासींची जी गोटूल संस्कृती आहे तिचे जतन करावे आणि तिला जतन करून समृद्ध करावे आणि आपली प्रगती साधावी. सध्याच्या परिस्थितीकडे बघितले तर व्यसनाच्या अधिन गेलेली आपली नवीन पिढी दिसत आहे. हे कुठेतरी थांबविण्यासाठी युवकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आदिवासींची गोटून संस्कृती ही नवीन जीवन निर्मितीसाठी गरजेची आहे. आदिवासी संस्कृती ही जीवनाला नवी कलाटणी देणारी संस्कृती आहे. जिच्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो व व्यक्तीच्या प्रामाणिकपणा व सचोटी याचे प्रतीक मानले जात असल्यामुळे चोरी, गुन्हेगारी व स्त्रियांवरील अत्याचार याचे प्रमाण कमी आहे. हे आदिवासी संस्कृती व आदिवासींकडून शिकण्याची फार मोठी गोष्ट आहे, असे मार्गदर्शन उषाकिरण आत्राम यांनी आपल्या भाषणातून केले.
यावेळी डॉ. मिलिंद बोकील मार्गदर्शक स्थानावरून बोलताना म्हणाले की, गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला गेला असला तरीही दिवसा गणित परिवर्तनाच्या माध्यमातून देशपातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या निर्मितीच्या प्रक्रियेत आदिवासींना स्वतःची ओळख व स्वतःचे स्वामित्व प्रधान करणारा एकमेव जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे. यामध्ये आदिवासींना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने मोठे योगदान दिलेले आहे. असे मिलिंद बोकील यांनी आपल्या अभ्यासातून व्यक्त केले. आदिवासी गोटूल संस्कृती ही सन्मान करायला शिकवणारी संस्कृती आहे. सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्याकडे पाहिलं तर देशपातळीवर तो पर्यटन जिल्हा म्हणून पाहिला जात आहे, एकेकाळी त्याला कोणीही ओळखत नव्हते.
डॉ. सुरेश सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलले की गडचिरोली जिल्हा हा विविधतेने नटलेला असून तो सदैव दातृत्वाच्या भूमिकेत आहे. म्हणून पुणे, मुंबई, दिल्लीचे लोक गडचिरोली जिल्ह्याचा शोध घेऊन आपल्या असलेल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी कार्यक्षेत्रांना भेट देऊन अभ्यास करण्यासाठी गडचिरोलीला येत असतात. हेच त्यांच्या ज्ञान देण्याचे दातृत्व आहे. यावेळी वर्षभर नाविन्यपूर्ण कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचे भेट वस्तू देऊन सन्मान व कौतुक करण्यात आले. सोबतच संस्था स्नेही म्हणून शासकीय अधिकारी व पत्रकार यांनाही शाल, श्रीफळ देऊन प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला. तसेच नव्यानेच सुरू झालेल्या दिव्यांग व्यक्ती कौशल्य व मार्गदर्शन शिबिराचा समारोप प्रसंगी दिव्यांगांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर ई. कार्यक्षेत्रातून बहुसंख्येने कार्यकर्ते व लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भारती सोनाग्रे / हुलगे व ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. तर प्रस्तावना डॉक्टर सतीश गोगलवार तसेच आभार प्रदर्शन निलेश तायडे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अमूल्य योगदान दिले.
News - Gadchiroli