आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारोप
- सुदृढ व सुसंस्कारित युवाशक्ती हीच देशाची गरज : मोतीलाल कुकरेजा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : सुदृढ व सुसंस्कारित युवाशक्ती हीच आजच्या भारताची खरी गरज आहे. सोबतच युवकांमध्ये सामाजिक भान असले पाहिजे, तेव्हाच त्यांच्या बुद्धीचा व शक्तीचा समाजासाठी उपयोग होऊ शकतो. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून हेच भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले जाते. विद्यार्थ्यांनी प्रदीर्घ वाचन करून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, आपल्यातील शक्तींना ओळखावे, वागण्यात सकारात्मकता बाळगावी, स्पर्धा परीक्षेत उतरावे व कठोर परिश्रम करून यश संपादन करावे. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणाकरिता महाविद्यालय व महाविद्यालयाच्या पाठीशी संस्था नेहमीच भक्कमपणे उभी राहील असे अमूल्य विचार मोतीलाल कुकरेजा, सचिव, नु शि प्र मंडळ, यांनी व्यक्त केलेत. संस्थेद्वारा संचालित आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या मौजा गांधीनगर येथे सुदृढ आरोग्यासाठी सशक्त युवाशक्ती व श्रमसंस्कार शिबिर संकल्पनेवर आधारित महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिबिरार्थी व उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर संस्थाध्यक्ष के जे घोरमोडे, संस्था सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल संस्थासदस्य अब्दुल जहीर शेख, संतुमल डोडानी, योगेश नागतोडे, सौ. सपनाताई धाकडे सरपंच, नेता सोंदरकर, उपसरपंच, चक्रधर बनकर, सदस्य ग्रा.प. गांधीनगर, प्रेमदास चहांदे, पोलीस पाटील गांधीनगर, गणेश ढवळे, माजी सभा. पंचायत समिती देसाईगंज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, राष्ट्रीय सेवा योजना गडचिरोली जिल्हा समन्वयक, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक व अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्य. अधिकारी तथा शिबिर प्रमुख प्रा. निलेश हलामी यांनी केले व शिबिरात केलेल्या श्रमदान, आरोग्य तपासणी शिबिर, पशु चिकित्सा शिबिर, बौद्धिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन व समाज प्रबोधन आदींवर प्रकाश टाकला. शिबिरार्थींनी आपल्या कामातून व वर्तनातून गावकऱ्यांची मने जिंकलीत व शिबिर यशस्वी केले. याकरिता प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी अभिनंदन केले व ग्रामवास्यांनी त्यात अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
शिबिरा दरम्यान शिबिरार्थींनी आपल्या शिस्तबद्ध कामातून ग्रामवासियांची मने जिंकली व श्रमदानातून ग्रामवासीयांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले असे गौरवोद्गार सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी ओमप्रकाश अग्रवाल, योगेश नाकतोडे यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले तर आभार प्रा. रमेश धोटे यांनी मानलेत. याप्रसंगी बहुसंख्य गावकरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
News - Gadchiroli