रिपब्लिकन विचारधारा बळकट करा : डॉ. कोसे
- गडचिरोली येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रिपब्लिकन विचारधारा ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या उच्च तत्त्वांवर आधारित असल्याने जगातील सर्वोत्तम विचारधारा आहे. हीच मूल्ये भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत आहेत. अनेक समांतर राजकीय विचार उदयास आले आणि काळाच्या ओघात नाहीसे झाले कारण ते निराधार होते पण रिपब्लिकन विचारधारा अजूनही जिवंत आहे. या विचार सरणीचा प्रचार करून पक्ष मजबूत करणे हे प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत आणि वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिपचे कार्यकारिणी सदस्य डॉ.डी.टी.कोसे यांनी रविवारी येथील प्रेस क्लब येथे आयोजित अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते तर अध्यक्षस्थानी सीईसी सदस्य अशोक टेंभरे, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, विदर्भ उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. कोसे पुढे म्हणाले की, समाजातील काही घटकांना अजूनही शोषणाची व्यवस्था चालू ठेवायची आहे. दुर्दैवाने या शोषणा विरुद्ध लढणाऱ्यांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढली पाहिजे आणि त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. रिपब्लिकन चळवळ ही नेहमीच मानवी समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत राहिली आहे आणि ही चळवळ अधिक जोमाने पुढे नेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी आणि समता सैनिक दल या तीन संघटनाच देशाला या संकटातून बाहेर काढू शकतात, असे डॉ.कोसे म्हणाले.
टेंभरे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दबलेल्या लोकांच्या उन्नतीसाठी केली होती. या पक्षात आजही जनतेचा खरा आवाज बनण्याची क्षमता आहे आणि कार्यकर्ते ते करण्यास सक्षम आहेत. यावेळी इतर पाहुण्यांची भाषणे झाली आणि कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, अनिल बारसागडे, नरेंद्र रायपुरे, तैलेश बांबोडे, नीता सहारे, डॉ. अंकिता धाकडे, वनमाला झाडे, ज्योती चौधरी, प्रतिमा बोडेले, एकनाथ अंबाडे, दादा धाकडे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. प्रकाश दुधे यांनी प्रास्ताविक, प्रा. राजन बोरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन तर प्रदीप भैसारे यांनी आभार मानले.
News - Gadchiroli