महत्वाच्या बातम्या

 हरभ-यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सदयस्थितीत हरभऱ्याचे पिक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान या घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असुन या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळयांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोडया मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलो-यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठया झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३०-४० घाट्यांचे नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन : घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकांचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे ) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर (१ ते २ अळया प्रति मिटर ओळ) आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलो-यावर आल्यानंतर घाटे अळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून कराव्या. पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१x१०९ पिओबी / मिली) ५०० एल. ई./ हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ई. सी., २० मि.ली. दुसरी फवारणी ( पहिल्या फवारणी नंतर १५ दिसानंतर) इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड २० टक्के डब्ल्युजी ५ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. २.५ मिली. असे कृषि सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण-३) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos