दहावी, बारावीच्या परीक्षेत आता होम सेंटर बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
तर यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्ष कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या या परीक्षा सण २०२० पूर्वी जसे घेण्यात आले होते. त्या पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत.
औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत यंदा बारावी परीक्षेसाठी १ लाख ६८ हजार २६३ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यांची ४३० परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तर दहावी परीक्षेसाठी १ लाख ८० हजार २१० विद्यार्थी परीक्षा देणार असून, ६२९ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षेत करण्यात आलेले बदल
कोरोना प्रादुर्भावामुळे २०२१ मध्ये दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढे २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. त्यामुळे विशेष निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात आले होते. ज्यात शाळा तेथे केंद्र, २५ टक्के कमी अभ्यासक्रम, याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला होता. मात्र यावेळी होम सेंटर रद्द करण्यात आले आहे, १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे, तसेच अधिकचा वेळ देखील मिळणार नाही.
News - Rajy