बंद कारखान्यात चोरट्यांचा धुमाकूळ : कारवाच्या बोर्ड इंडस्ट्रीजमधून हजारांचा माल केला लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारवा येथील श्री गोविंदा बोर्ड इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या पेपर बोर्ड बनविणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४२ हजार रुपयांचा साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मनिष प्रभाकर बैरम (वय ४७), रा. जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी सोनाली मनिष बैरम यांच्या नावावर कारवा येथे श्री गोविंदा बोर्ड इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. ही कंपनी गेली दोन वर्षांपासून बंद असून, तेथे कोणी राहत नव्हते तसेच सुरक्षारक्षकही नेमलेला नव्हता.
तक्रारदार यांनी दिनांक ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कंपनीत पाहणी केली असता सर्व सामान व्यवस्थित होते. मात्र ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता ते आपल्या मित्रासह पुन्हा कंपनीत गेले असता, काही साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता ५ एचपी, ३ एचपी आणि ३० एचपी क्षमतेच्या तीन मोटारी, एक ३० एचपी स्टार्टर तसेच लोखंडी भंगार साहित्य असा एकूण ४२ हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




