साहित्य संमेलन यशस्वी करणे ही सर्वांची जबाबदारी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
- साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीकरिता सभा
- प्रशासन आणि सामाजिक संस्थांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वनियोजनाकरिता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच समिती प्रमुखांची सभा विकास भवन येथे घेण्यात आले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या शासकीय आणि अशासकीय अशा दोन्ही घटकांचा सहभाग असून संमेलन यशस्वी करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
या सभेला सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, मनोज खैरनार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, कार्यवाह विलास मानेकर, वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी संमेलन स्थळ, वाहनतळ, सभामंडप, परिवहन व्यवस्था, निवास व्यवस्था, ग्रंथ दिंडी, शहर सुशोभिकरण, मुख्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिनिधी व्यवस्था, स्वयंसेवक प्रशिक्षण, जनसंपर्क व प्रसिद्धी, मार्केटिंग, ग्रंथ प्रदर्शन स्टॉल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सभेत शिक्षणाधिकारी सचिन जगताप, अभियंता महेश मोकलकर, मुरलीधर बेलखोडे, अतुल शर्मा, लक्ष्मीनारायण सोनवणे, सुनील फरसोले, पद्माकर बाविस्कर, हरीश इथापे, अनघा आगवन, प्रा. राजेंद्र मुंढे, श्याम भेंडे, आसिफ जाहीद, श्रीकांत वाघ, रवींद्र कडू, ज्योती भगत यांनी सूचना मांडले.
News - Wardha