आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५लाख रूपयांचे आरोग्य विमा कवच
- चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात असून या योजने अंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतीक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या आरोग्य विम्याच्या माध्यमातुन खाजगी व सरकारी रूग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर रूग्णास मोफत सेवा देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत कॅन्सर, हृदय रोग शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, मुत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणना - २०११ यादी अनुसार लाभार्थी नागरिकांची निवड करण्यात आली आहे. या यादी नुसार चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण१६५२७ लाभार्थी कुटूंबाचा समावेश असून ७२३९४ नागरिक या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत एकूण १२२०० नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील मान्यता प्राप्त रूग्णालय, सामान्य रूग्णालय, मुसळे रूग्णालय, मानवटकर रूग्णालय क्राईस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे रूग्णालय, डॉ. अजय वासाडे रूग्णालय येथे आयुष्यमान कार्ड निःशुल्क काढून देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या माध्यमातुन आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ लक्ष रूपयांचे आरोग्य कवच उपलब्ध होणार असल्याने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या योजनेचा मोठया प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
News - Gadchiroli