फ्रॉड कॉल आता लगेच समजणार : आरबीआयने नवीन मार्गदर्शक सूचना केले जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आरबीआयने बँकांसाठी काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बँका आता ग्राहकांना फोन करण्यासाठी विशेष फोन नंबर सिरीजचा वापर करणार आहेत. व्यवहारांसाठी बँकांना १६०० नंबर सिरीज वापरण्याची सूचना देण्यात आली आहे, तर प्रमोशनल उद्देशाने कॉल किंवा एसएमएस पाठवण्यासाठी १४० नंबर सिरीजचा वापर केला जाईल.
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे, आणि त्याला विश्वास आहे की यामुळे फसवणुकीला आळा बसेल. याशिवाय, आरबीआयने बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या डेटाबेसचे निरीक्षण करण्याचे आणि अनावश्यक डेटा काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
आरबीआयच्या परिपत्रकात बँकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरचे योग्य पडताळणी करून अपडेट करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच, रद्द केलेल्या मोबाइल नंबरशी जोडलेल्या खात्यांचे निरीक्षण वाढविण्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामुळे खाती फसवणुकीपासून सुरक्षित राहतील.
आरबीआयने ३१ मार्च २०२५ पर्यंत या सूचना पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. डिजिटल व्यवहारांच्या वाढीमुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत, परंतु यामुळे फसवणुकीतही वाढ झाली आहे, असे आरबीआयने सांगितले आहे.
आरबीआयने बँकांना सर्व विद्यमान आणि नवीन खात्यांसाठी नामांकित व्यक्तींची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खातेधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना होणारा त्रास कमी होईल आणि दाव्यांचे जलद निपटारे होईल. बँका खात्याच्या उघडण्याच्या फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना नामांकनाची सुविधा मिळेल. तसेच बँका आणि एनबीएफसींनीही नामांकित व्यक्तींची संख्या सुनिश्चित करण्यासाठी मोहिमा सुरू कराव्यात, असे आरबीआयने सांगितले आहे.
News - Rajy