महत्वाच्या बातम्या

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल ८० हजार ८६५ कोटी रूपयांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे.

त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या करोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. महत्वाचे म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.

अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 591 प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये 34 हजार 628 कोटींच्या फसवणुकींची 5 हजार 488 प्रकरणे, 2020 मध्ये 23 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणूकींची 4 हजार 109 प्रकरणे घडली आहेत. तर 1 जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 5 हजार 241.93 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे.

स्टेट बॅंकेच्या या महा घोटाळ्यात बॅंकेतीलच 610 कर्मचाऱ्यांचा सहभगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक 175 कर्मचाऱ्यांचा सहभाग 2018 मध्ये होता.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक आहे. 1 एप्रिल 2017 रोजी SBI मध्ये पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर ती जगातील 50 सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत सामील झाली आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील हे सर्वात मोठे विलीनीकरण होते. विलीनीकरणानंतर एसबीआयच्या एकूण 24 हजार शाखा आणि जवळपास 59 हजार एटीएम आहेत. भारताव्यतिरिक्त SBI च्या परदेशातही शाखा आहेत. 37 देशांमध्ये 198 कार्यालये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1806 मध्ये स्थापन झालेल्या बँक ऑफ कलकत्तापासून झाली. ही भारतीय उपखंडातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक होती. ब्रिटिश भारताच्या काळात बँक ऑफ कलकत्ता आणि बँक ऑफ मद्रास यांचे विलीनीकरण करून इम्पीरियल बँक बनवण्यात आली, ज्याचे नाव 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले. भारताची मध्यवर्ती बँक RBI ने 1 जुलै 1955 रोजी इम्पीरियल बँक ताब्यात घेतली.





  Print






News - World




Related Photos