वीजदर महागड्या झाल्यामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर सहा उद्योगांनी विजेच्या मागणीत कपात केली आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून पुढील काही वर्षांत वीज दरामुळे अनेक उद्योग बंद होऊन राेजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी उद्योजकांना चिंता आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश स्टील उद्योग बंद झाल्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात तसेच ओडिशा आणि झारखंड या राज्यांनी महाराष्ट्राची स्टील बाजारपेठ काबीज केली आहे. याकडे शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची मागणी आहे.
राज्यात उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत ७५ टक्के अधिक दराने वीज विक्री होते. यामुळे उत्पादन शुल्क वाढते व त्यामुळे उद्योगांना भुर्दंड बसतो. छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांत तुलनेने कमी वीज दर आहेत. हीच बाब लक्षात घेऊन स्टील उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत.
- सरकारने आता तरी गंभीर व्हावे.
उद्योगांच्या वीज मंजुरीला मर्यादेपलीकडे विलंब होतो. सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. वीज सबसिडी संदर्भात फडणवीस सरकारने २०१९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी २०२४ पर्यंत करावी आणि क्रॉस सबसिडी व इतर शुल्क कमी करून स्वस्त वीज खरेदी करावी.
News - Nagpur