ठाणेगाव येथे भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट


- नळयोजनेच्या मोटारमध्ये बिघाड आल्याने २१ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथील नळयोजना मागील २१ दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरीकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अद्यापही मोटार दुरूस्त करण्यात न आल्याने नागरीकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे.
ठाणेगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील गाढवी नदीवर नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. नळयोजनेतून नागरीकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मागील २१ दिवसांपूर्वी नळयोजनेच्या मोटार जळाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. परिणामी नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
गावातील काही विहिरी व हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नाही. यामुळे नागरीकांना वासाळा मार्गावर असलेल्या विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. तसेच ठाणेगाव नवीन व जुने या गावांच्या मधात असलेल्या एका हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे. काही नागरीक गावातील हातपंपाच्या पाण्याचा वापर करीत आहेत. मात्र पाणी पिण्योग्य नसल्यामुळे नागरीकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्यास्थितीत शेतीमध्ये निंदण करण्याचे काम सुरू असल्यामुळे महिला वर्ग व्यस्त आहेत. शेतात जाण्याची गडबड असतानाच पाण्याची समस्या उभी ठाकली असल्यामुळे तसेच नागरीकांची गर्दी होत असल्यामुळे ताटकळत राहावे लागत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी, सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे.
ठाणेगाव येथील नळयोजना ठप्प पडण्याची बाब नित्याचीच झाली आहे. कधी मोटार मध्ये बिघाड तर कधी पाईपलाईन फुटणे अशा प्रकारामुळे ग्रामपंचायतीचा नियोजनशुन्य कारभार चव्हाट्यावर येत आहे. या कारभारामुळे नागरीकांना त्रास सहण करावा लागत असून नळयोजना कायमस्वरूपी सुरू रहावी याकरीता उपाययोजना करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-09-30