महत्वाच्या बातम्या

 सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे : न्यायमूर्ती भूषण गवई


- हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राजकिय समानतेसोबत सामाजिक समानतेचे अधिकार दिलेले आहेत. घटनेतील कलमानुसार सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी न्यायालयांची भुमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लक्ष रुपये खर्च करुन सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजन व कोनशीला समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुबंई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती नितीन वा. सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धाच्या पालक न्यायमूर्ती मुकुलीका जवळकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा चे अध्यक्ष तथा पालक सदस्य ॲड. पारिजात पांडे, ॲड. आशिष देशमुख, आसिफ कुरेशी, अनिल गोवरदिपे, मोतीसिंग मोहता, हिंगणघाट वकील संघाचे अध्यक्ष राजेश बोंडे आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील या हिंगणघाट येथील नव्याने उत्कृष्ट अशा बांधण्यात येणा-या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतून सर्व सामान्यांना व पिढयानुपिढ्या वंचित राहिल्या घटकांना न्याय देण्याचे काम न्यायालयातून व्हावे, अशी अपेक्षा यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली. कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळात कसा न्याय देता येईल, याकडे लक्ष दयावे असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.

सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्राचा वारसा लाभलेल्या हिंगणघाट येथील न्यायालयातून सर्वसामान्यांना न्याय देण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शासन सर्वसामान्यांना देत असलेल्या सुविधाचा पूर्ण वापर होण्यासाठी न्यायालयांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असे न्यायमूर्ती नितीन सांबरे म्हणाले.

नव्याने बांधन्यात येणाऱ्या न्यायालयाच्या इमारतीतून काम करतांना वकीलांनी आपल्या जेष्ठ विधीज्ञाचा आदर सन्मान राखावा व नवीन इमारतीची प्रतिमा उंचवावी असे न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर म्हणाल्या.

भौगोलिकदृष्टया महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेल्या हिंगणघाट येथे नव्याने होणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीतून  सामाजिक व सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे न्यायाधिश संजय भारुका यांनी सांगितले.

तत्पुर्वी न्यायमुर्ती भूषण गवई यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन इमारत बांधन्यात येणाऱ्या जागेवर कुदळ मारुन भूमीपूजन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश बोंडे यांनी केले. यावेळी विविध न्यायमुर्ती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागपूर, वर्धा, अकोला येथील न्यायाधिश, बार  कॉन्सील संघटनेचे पदाधिकारी, न्यायाधिश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos