महत्वाच्या बातम्या

 मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा


- शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी : माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील विविध भागात अपुरी बससेवा, प्रवासी निवाऱ्याचा अभाव, बससेवेअभावी दररोजची पायपीट यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींची गैरसोय सुरूच आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यावर उन्हाचे चटके, पाउस, वारा झेलत कितीतरी तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने आता लालपरीवर  शालेय विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. 

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील फाट्यावर  बसच्या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थिनींना कितीतरी तास थांबावे लागत आहे. त्यात निवारा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो आहे तर मार्कंडा कंन्सोबा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टी येथे बसच्या प्रतीक्षेत कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. 

तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद शाळा खाजगी संस्थेचे विद्यालये व महाविद्यालय डीएड, बीएड कॉलेज असल्याने परिसरातील १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील जवळपास २० गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे विद्यार्जन करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, चंदनखेडी, मार्कंडा कंन्सोबा, लगाम सिंगनपल्ली या गावातील विद्यार्थ्यांना आष्टी येथे जावे लागते. आष्टी मधून परत स्वगृही परत जाण्यासाठी बाजूला निवारा आहे, तोही मोडकळीस आलेला आहे व अखेरची घटका मोजत आहे परंतु आष्टी येथून परत जात असताना आष्टी या शहरात  विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेमध्ये तासभराहून अधिक काळ थांबावे लागत आहे, त्या बाजूला विद्यार्थिनींना बसण्याच्या निवारा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 

या ठिकाणी बसण्यासाठी निवारा व्हावा, अशी शालेय विद्यार्थिनींच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांच्याकडून मागणी  केली जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. मागील काही काळात प्रवासी निवारा मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बांधण्यात आला आहे. परंतु त्या प्रवासी निवाऱ्याची संपूर्ण दुर्दशा झाली असून बसण्यायोग्यही नाही. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या झाडांचा प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा करावी लागत असे, एसटी आली की, प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना व विध्यार्थांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर तीनही बाजूंनी वाहने आली की, मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतो. नाका-तोंडात धुळीकण जात असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी  शेड उभारण्यात यावा अशीही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार भास्कर फरकडे यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos