वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन काळाची गरज : न्या. सचिन पाटील
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी नागपूर : नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत अज्ञान अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतूक नियमांबाबत विस्तृत जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण टाळता येईल, असे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व टि. डब्ल्यु. जे. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणी चौक येथे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून रस्ते वाहतूक नियम या विषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वाहतूक पोलीस निरिक्षक विश्वास पुल्लरवार, टि. डब्ल्यु. फाऊंडेशनचे शाख व्यवस्थापक विनोद चौधरी, सुमंत ठाकरे, तुषार पुरी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यीदशेपासूनच मुलांमध्ये मोटार वाहन कायदा आणि वाहतूक नियमांविषयी जागृती करणे आवश्यक आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणे किंवा त्यांचे मृत्युस कारणीभूत ठरणे अशा अपराधांवर भारतीय दंड संहितेमध्ये शिक्षा प्रावधानित करण्यात आली आहे.याच बरोबर 18 वर्षाखालील बालकांना वाहन चालविण्यास देणे अपराध आहे. सर्वांनी वाहतूक नियमांची माहिती घेऊन वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे काळाजी गरज असल्याचे न्या. पाटील म्हणाले.
यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांनीही मार्गदर्शन केले. वाहनचालकांना नेक सेफ्टी बेल्टचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव शेखर तर उपस्थितांचे आभार तुषार पुरी यांनी मानले.
News - Nagpur