पाणी आणि माती हीच खरी राष्ट्राची संपत्ती : डॉ. राजेंद्र सिंह
- चला जाणूया नदीला अभियान विद्यार्थ्यांसाठी जलजागृती कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सृष्टी आपणास सदैव शिकवते. मेघ पाणी देतात, झाडे फळ तर फुले सुगंध देतात. आपण सर्व त्याचा उपभोग घेतो. या सृष्टीला, नद्यांना आपण जपले पाहिजे. नदी आपली माता तर जंगल, वृक्ष हे पिता आहे. पाण्याचा थेंब अन् थेंब अडवून तो जिरविण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वी पाणीदार व समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलपुरूष मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, विद्यापीठ शताब्दी समिती, राष्ट्रीय सेवा योजना, निसर्ग सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन पार्क येथे डॉ. राजेंद्र सिंह यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाम नदीचे समन्वयक डॉ. भरत महोदय तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे, अभियानाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, जलबिरादरी महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चूग, जलतज्ञ व धाम नदी समन्वयक माधव कोटस्थाने, डॉ. राजेश भोयर, अभियानाच्या राज्य समितीचे सदस्य रमाकांत कुलकर्णी, नदी समन्वयक सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे, सप्त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे उपस्थित होते.
पाणी व माती हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे, त्यामधूनच समृद्धी उगवते. नदीच्या संरक्षणासाठी माणूस, संस्कृती व निसर्ग यांच्यात चांगले नाते निर्माण झाले पाहिजे. पर्यावरण व नद्यांच्या संरक्षणाची प्रेरणा घेऊन भरीव कृतिशील युवक युवती तयार व्हावेत, या हेतूने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयीन ५०० पेक्षा अधिक युवकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी, डॉ. संजय दुधे यांनी देखील यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. प्रास्तविक निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी केले.
ऑक्सिजन पार्क परिसरात लावलेल्या विविध ८० प्रजातींची माहिती देणारे ॲप तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल प्रा.डॉ. सारंग धोटे यांचा डॉ. राजेंद्र सिंह यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शोभा बेलखोडे व किरण पट्टेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ समन्वयक आशिष पिसे, जिल्हा समन्वयक रवींद्र बन्नगरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास दामोदर राऊत, बाळकृष्ण हांडे, अतुल शर्मा, अजय तिगावकर, मिलिंद भगत, ॲड. नंदकिशोर वानखेडे, शेख हाशम, प्रभाकर पुसदकर, सरवदे उपस्थित होते.
News - Wardha