महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामाचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम महामंडळाद्वारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके याची शास्त्रोक्त पध्दतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी असलेल्या महामंडळाच्या गोदामात शेतक-यांनी शेतमालाची साठवणूक करुन अत्याधुनिक सोई, सुविधा व सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, कारंजा (घाडगे) येथे प्रत्येकी एक वखार केंद्र असून वर्धा येथे शिवनगर व औद्योगिक परिसरात एक असे एकुण वखार केंद्र आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषिमालाच्या साठवणूकीस प्राधान्य देऊन महामंडळाच्या गोदामामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते.

ठेविदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास, ठेविदारांना बँकेकडुन त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नतंर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणूकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालु पिकांचा ७/१२ उतारा दिल्यानतंर वखार भाडयात प्रचलित साठवण दराच्या ५० टक्के सवलत देऊन २५ टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय, प्रत्येक पंधरवाड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो.

साठवणूकीस असलेल्या सर्व मालाला १०० टक्के विमा संरक्षण दिल्या जाते, त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते तसेच वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बैंक यांचे सयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखारपावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडुन संबधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते.

सदर तारण कर्जाचा व्याजदर ९ टक्के असुन इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा १० लाख प्रती शेतकरी व ७५ लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणूकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखारपावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबंधित शेतकरी/ठेविदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन विभाग प्रमुख, नागपूर यांनी केले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos