महत्वाच्या बातम्या

 वखार महामंडळाच्या सोई, सुविधा व सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असून राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषि क्षेत्रास अन्नधान्याची नासाडी होऊ नये म्हणून साठवणूकीची सुविधा पुरविण्यासाठी वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महामंडळाव्दारे शेतीमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके याची शास्त्रोक्त पध्दतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाची मुबंई, पुणे, नागपूर, कोल्हापुर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, लातूर अशी ८ विभाग आहेत. नागपूर विभागात ६ जिल्हयात एकुण १८ वखार केन्द्रांवर ११४ गोदामे असुन साठवणूक क्षमता २.०३ मे.टन इतकी आहे. या सोई, सुविधा व सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर विभागाचे प्रमुखांनी केले आहे.

राज्यातील महामंडळाची एकूण २ हजार ५४ वखार केन्द्रावर १ हजार १७३ गोदामांची एकूण साठवणूक क्षमता २ हजार ४० इतकी असून नागपूर विभागातंर्गत भंडारा जिल्हयात तुमसर, चंद्रपुर जिल्हयात ब्रम्हपुरी, चंद्रपुर (पडोली), चंद्रपुर (औ) व वरोरा, गडचिरोली जिल्हयात गडचिरोली व वडसा (देसाईगंज), गोर्दिया जिल्हयात आमगाव व अर्जुनी (मोरगाव), नागपूर जिल्हयात वाडी-हिंगणा, बुटीबोरी, काटोल व सावनेर तसेच वर्धा जिल्हयात आर्वी, हिंगणघाट, कारंजा (घाडगे), वर्धा (शिवनगर) व वर्धा (औं) अशी गोदामे आहेत.

शेतमाल उत्पादन बरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषिमालाच्या साठवणूकीस प्राध्यान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामांमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेविदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास, ठेविदारांना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थ सहाय्य व नतंर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणूकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालु पिकांचा ७/१२ उतारा दिल्यानतंर वखार भाडयात प्रचलित साठवण दराच्या ५० टक्के सवलत देऊन २५ टक्के जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. याशिवाय, प्रत्येक पंधरवाड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणूकीस असलेल्या सर्व मालाचा १०० टक्के विमा संरक्षण दिल्या जाते, त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

याशिवाय, वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांचे सयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडून संबधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीव्दारे जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर ९ टक्के असुन इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा १० लाख प्रती शेतकरी व ७५ लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणूकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखारपावतीवर ऑनलाईन तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबधित शेतकरी/ठेविदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यासाठी होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos