सोनार समाजाने आपल्या पारंपारीक व्यवसायाला कलात्मकतेची जोड दयावी : हंसराज अहीर
- कटीबंध संत नरहरी महाराज या चित्रपटाचा उद्घाटन सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या सतांनी आम्हांस दया, क्षमा व शांतीची शिकवण दिली या संताच्या मांदीयाळीत संत श्री नरहरी महाराज यांचीही महती फार मोठी आहे. त्यांची शिकवण व अभंग हे सर्व समाजाला सदैव प्रेरणादायी ठरले. महाराजांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटाची निर्मिती होत आहे याचा विशेष आनंद असून याद्वारे नक्कीच भावी पिढीला संस्कारक्षम बनविण्यास मदत मिळेल असा विश्वास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
स्थानिक प्रियदर्शिनी सभागृह येथे २४ डिसेंबर रोजी आयोजित खुशी प्रॉडक्शन निर्मित कटीबंध संत नरहरी महाराज या चित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर आ. किशोर जोरगेवार, चित्रपटाचे निर्माते संजय जाधव, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य किरण गजपूरे, माजी जि.प. सदस्य संजय गजपूरे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्षांचे अतिरीक्त खाजगी सचिव रवि चावरे, सोनार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल चावरे, कोषाध्यक्ष सुमेध कोसुलकर, ॲड. प्रशिक ताठे, विनोद पांढरे, सुभाषराव रोकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सोनार समाज हा कौशल्यप्राप्त समाज असून त्यांनी आपल्या पारंपारिक व्यवसायास अधिक वृध्दिंगत करावे. पवित्र मंदीरावरील कळस हे सोनार समाज घडवित असतो याचे महत्व लक्षात घेवून सुवर्णकामाचा वाव समाजात वाढत असतांना समाजातील सर्व युवकांनी या कौशल्याकडे विषेश लक्ष द्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक व्यवसायास जोड देण्याकरिता विश्वकर्मा योजनेची सुरूवात केली असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.
संत नरहरी महाराजांचे विचार सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी समाजातील शिक्षितांनी प्रयत्न करावे. या समाजातील युवकांना शिक्षणाबरोबरच आपल्या पारंपारिक व्यवसायातील कलात्मकतेला नवा आयाम देत आपली कला जोपासावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. किशोर जोरगेवार व अन्य अतिथींनी समायोचीत विचार व्यक्त केले. कार्यकमाचे प्रास्ताविक संजय गजपूरे यांनी तर संचालन सुमेध कोसुलकर यांनी केले.
News - Chandrapur