महत्वाच्या बातम्या

 आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


- राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आपल्याला काय मिळाले या पेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नागपूर विधानभवन येथे आयोजित ५० व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संसदीय कार्य प्रणालीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार ॲड्. आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव  विलास आठवले तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, अधिव्याख्याता उपस्थित होते.

संसदीय अभ्यास वर्गात राज्याचे, देशाचे भवितव्य घडताना पाहता येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजकीय व्यक्ती व प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढवण्यासाठी संसदीय अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घ्यावी व ती लोकांपर्यंत पोहचवावी. विधानमंडळाला गौरवशाली परंपरा आहे. त्यामध्ये एक ऊर्जा आणि प्रेरणा आहे. विधानमंडळ म्हणजे जनतेसाठी एक ऊर्जा आहे. अनेक प्रश्नांवर येथे चर्चा होत असते. ती पाहण्याची व कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातात हे समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विधानमंडळाच्या माध्यमातून करत असतो. लोकांना त्यांच्या घरी जाऊन योजनांचा लाभ देणारी  शासन आपल्या दारी  ही योजना आपण सुरू केली आहे. आपण सर्वांनी समर्पित भावनेने काम करूया. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे ही शासनाची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. देशाला एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

शासन लोककल्याणकारी अनेक योजना राबवत असते. या योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी चांगले काही करण्याची भावना असली पाहिजे. समर्पित भावनेने काम केले पाहिजे. या अभ्यासवर्गामध्ये विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, कायदे कसे निर्माण होतात हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम आपल्यासर्वांकडून व्हावे हाच या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याची विधिमंडळात क्षमता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला समृध्द लोकशाही दिली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संधीची समानता शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी सभागृह काम करत असते. लोकशाहीचे ज्ञान, सखोल माहिती लोकांपर्यंत पोहचावी, त्याचा अभ्यास व्हावा, प्रक्रिया समजावी व त्याची प्रगल्भता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभ्यास वर्ग महत्वाचा आहे. राज्य घटनेने विधान मंडळांना दिलेल्या अधिकारानुसार विधानमंडळाचे कामकाज होते. या अधिकारानुसार सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम होत असून विधानमंडळ हे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविकात संसदीय अभ्यासवर्गाची परंपरा, महत्त्व आणि इतिहास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार ॲड. शेलार यांनी केले.

यंदाच्या अभ्यास वर्गामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधील राज्यशास्त्र व लोक प्रशासन विषयातील ८१ विद्यार्थी व १२ अधिव्याख्याता सहभागी झाले आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos