महत्वाच्या बातम्या

 तुरुंगात आता मिळणार कांदा-लसूणविरहित जेवण : कारागृह विभागाचे परिपत्रक जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : कारागृहातील कैद्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असतानाच, आहारात कांदा व लसणाशिवाय जेवणाचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारी कारागृह विभागाने याबाबत परिपत्रक जारी करत सर्व कारागृहांत हे आदेश लागू केले.

कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृह विभागात सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात कैद्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. तसेच अमिताभ गुप्ता यांना कारागृह भेटीच्या वेळी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील काही बंद्यांनी धार्मिक व आरोग्याच्या कारणास्तव स्वयंपाक करताना त्यात कांदा व लसूण याचा वापर करू नये अशी विनंती केली. याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली.

ज्या कारागृह संस्थांना कारागृहात बंद्यांचा आहार तयार करताना साधनसुविधा व कारागृह सुरक्षिततेचा विचार करून सहज शक्य होत असेल, तर कांदा व लसूण न वापरता जेवण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

बंद्यांच्या विनंतीनुसार जे बंदी कांदा व लसूण यांचा वापर न करता तसेच कमी तिखट असलेल्या भाजीची मागणी करत आहेत, अशा कैद्यांना आरोग्याच्या दृष्टीने व आहारविषयक परंपरेचा विचार करून वेगळी भाजी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे नेमक्या कुठल्या कैद्यांसाठी? असाही सूर काहींकडून येत आहे.

सद्य:स्थिती काय? : 
- राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत.
- सर्व कारागृहांची क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांची आहे.
- सध्या सर्व कारागृहांमध्ये ४१ हजार १९१ कैदी आहेत.
- मुंबई, पुणे, ठाण्यातील कारागृहे सर्वाधिक गर्दीचे आहेत.
- नुकतेच ३० वर्षांवरील कैद्यांसाठी जाड अंथरूण देण्याचा निर्णय कारागृह विभागाने घेतला.

कैद्यांच्या मागणीनुसार निर्णय : 
कारागृहातील भेटीदरम्यान अनेक कैद्यांनी कांदा व लसणाशिवाय जेवण देण्याची विनंती केली. त्यानुसार, अन्य जेवणाबरोबर या जेवणाचाही आहारात समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून भविष्यात कैद्यांच्या आहाराविषयी तक्रारी कमी होतील.





  Print






News - Rajy




Related Photos