महत्वाच्या बातम्या

 आगामी निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी संजय मिना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी केले.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारुप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९  डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे केलेल्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे की, नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशिल सुद्धा अचुक आहेत का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलांमध्ये दुरूस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. ८ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता (१ जानेवारी २०२४) मतदार नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकतसुद्धा घेता येते. एखाद्या मतदार संघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदार संघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधीत मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार यद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी महत्वाची असते.

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व १९नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या समाज घटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेचा कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे या समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकतील.

२७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

२७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदार संख्या ८ लक्ष २ हजार ७९९ एवढी आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६९.५६ इतकी आहे. २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदारसंख्या ४ लक्ष ६ हजार २६४, स्त्री मतदारसंख्या ३ लक्ष ९६ हजार ५२८ एवढी तर तृतीयपंथी समुदायाची संख्या ७ इतकी आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos