अहेरी मार्गावरील बस फेऱ्या झाल्या कमी : प्रवाशांचे होत आहेत हाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर ते अहेरी व्हाया बल्लारपूर, कोठारी, गोंडपिपरी आलापल्ली या भागात जाणाऱ्या एसटी बसेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांचे प्रवासादरम्यान मोठे हाल होत आहेत. फेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
चंद्रपूर ते अहेरी मार्गावर प्रवाशांची संख्या बरीच मोठी आहे. सुरक्षितता व इतर कारणांनी प्रवाशी एसटी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. कोरोना पूर्वकाळात या मार्गावर दिवसातून निदान २५ ते ३० बसेस धावायच्या. कोरोना काळात यात घट करण्यात आली होती. कोरोना पूर्णतः गेल्यानंतर बसेसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या होत्या. मात्र, मागील काही महिन्यांपासून बसेसच्या फेऱ्यांमध्ये घट करण्यात आली आहे. २५ ते ३० जागांवरून घसरून ते १२ ते १५ एवढ्या कमी करण्यात आल्या आहेत. याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
प्रवाशांना बसेसची तास न् तास वाट बघत बसावे लागते. दोन-तीन तासाने एखादी बस आलीच तर ती आधीच प्रवाशांनी गच्च भरून असते. त्यामुळे अशा बसमध्ये प्रवेश करणे जिकिरीचे होऊन बसते. प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ते बघता या मार्गावर बसेसची संख्या पूर्ववत वाढविणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
News - Gadchiroli