लोकसहभागातून श्रमदानाने वनराई बंधारे बांधण्यासाठी सहकार्य करावे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पावसाळा संपत आल्याने ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित पाणी देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे तसेच लोकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होण्याकरीता लोकसहभागातून कृषि विभागाच्यावतीने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी प्रत्येक गावाने गावातील कृषि सहाय्यकाशी संपर्क साधून वनराई बंधारे बांधून घेणे आवश्यक आहे. त्याकरीता गावातील नागारिकांनी सहभाग घेऊन श्रमदानाने हे बंधारे बांधून गावातील विहिरीची पाण्याची पातळी वाढवावी. बंधारे बांधण्याकरीता रिकाम्या गोण्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रिकाम्या गोण्यामध्ये नाल्यातील गाळ भरुन कृषि सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य गोण्यांची रचना करुन वनराई बंधारे बांधता येतील.
सन २०२३ -२४ मध्ये जिल्ह्यात सुमारे १ हजार वनराई बंधारे बांधण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सरासरी २ हेक्टर प्रमाणे एकूण २ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचन उपलब्ध होईल, असे अपेक्षित आहे. काही ठिकाणी अधिकचा पाणीसाठा होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकेल. वनाराई बंधा-याच्या आजुबाजूच्या असलेल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरीता मदत होईल व वनराई बंधा-याच्या पाणी साठ्यामधून पाण्याचा उपसा करुन रब्बी व उन्हाळी हंगामाध्ये भाजीपाला, कडधान्ये यासारखी पिके घेण्यासाठी करता येईल.
याशिवाय वनराई बंधा-यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरीता, गुरांना पाणी पिण्याकरीता करता येईल. एका वनराई बंधा-याचे महत्व बहुमोल असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकसहभागातून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह कृषियंत्रणेस सहकार्य करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha