वेगावर नियंत्रण ठेवून रस्ते अपघात टाळता येतात : ऍड. रमेश शहारे नागपूर
- जन आक्रोश या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रस्त्यावरून गाडी चालवताना आपण कधी कधी मोबाईलवर बोलत असतो. कधी आपले लक्ष बाहेर कुणाकडे तरी असते, काही लोक दारू पिऊन गाडी चालवतात, काही लोकांची पुरेशी झोप झालेली नसते, काही लोक कायद्यानुसार पूर्ण वयाचे होण्याआधी गाडी चालवतात कारण कोणतेही असो आपले मन स्थिर नसेल, मन विचलित झाले असेल, किंवा मनाचे संतुलन न रागता रस्त्यावरून आपण प्रवास करीत असू तर अपघाताला ते निमित्य ठरते. गाडी चालव नाऱ्याचा कळत नकळत बेजबाबदारपणा हा रस्त्यावर अपघात मात्र निश्चित घडवत असतो. आज आपल्या देशात एखाद्या आजाराने मृत्युमुखी पडणार नाही तेवढी माणसे रस्त्यावर मरत आहेत. अपघाताचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण पाहता समाजात एक दुःखाची छाया दाटून आली आहे. कुणाचातरी वडील, कुणाची तरी आई, एखाद्या घरातील कर्ता पुरुष किंवा लहान मुलांचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असते. म्हणून रस्ते अपघात टाळायचे असेल तर कायद्याचे पालन केले पाहिजे आणि वेगावर नियंत्रण ठेवून गाडी चालवताना पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जनआक्रोश या संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक ऍड. रमेश शहारे यांनी केले.
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिवस यानिमित्याने रस्ते अपघात टाळण्यासाठी या विषयावर जन आक्रोश या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनामाची उद्दिष्टे म्हणजे रस्ते अपघाता संदर्भात विद्यार्थ्यांना जागृत करणे. रस्त्यावरील रहदारीचे नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. अपघात टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे.
भारतात रोज रस्त्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्या अपघाताची कारणमीमांसा तसेच यावर काही उपाय शोधता येईल अशा प्रकारे या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. रस्त्यावरून प्रवास करताना रहदारीचे नियम विद्यार्थ्यांना सांगितल्या गेले. अपघात टाळण्यासाठी विविध उपाय योजना विद्यार्थ्यांना समजल्या.
विद्यार्थ्यांच्या मनातील यासंदर्भातील विविध शंका आणि प्रश्नांना उत्तर देऊन निरसन करण्यात आले. अपघाताचे विविध छायाचित्र आणि व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. जन आक्रोश या संस्थेचे गिरीश देशपांडे आणि रमेश शहारे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे हे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन कोर्तलवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. हेमंत मेश्राम यांनी मानले. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच बहुसंख्य विद्यार्थी तसेच प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
News - Chandrapur