महत्वाच्या बातम्या

 दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी काम करा : बच्चू कडू


- अभियान अध्यक्षांकडून दिव्यांग कल्याणाचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. परंतू त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कालमर्यादेत त्यांच्यापर्यंत योजना व राबविण्यात येणारे उपक्रम कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करा. घरकुलासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. परंतू अद्यापही अनेक दिव्यांगांना घरे मिळाले नाही. जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, यासाठी काम करा, असे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभाग व महामंडळांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत कडू यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अद्याप दिव्यांगांच्या प्राथमिक गरज देखील पुर्ण झालेल्या नाही. जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करा.

दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी खर्च होईल याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवा. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा विषय तहसिलदार, अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पुरवठा निरिक्षक तर वैश्विक ओळखपत्र, विविध प्रमाणपत्र त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवा. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना शक्ती केंद्र करा, असे कडू यांनी सांगितले.

दिव्यांगांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावे. दिव्यांग जन्मालाच येऊ नये. जन्माला आलेल्या दिव्यांग बालकांवर वेळीच उपचार करून त्याचे दिव्यांगत्व नाहीसे करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जावे. दिव्यांगांना कृत्रिम अंगांचे वितरण केले जातात, हे अंग उत्तम दर्जाचे असावे.

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रमांची ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जावे. सर्वसाधारण लाभार्थ्यांसह दिव्यांगांना घरकुलाचा प्राधान्याने लाभ दिला जातो. अनेक दिव्यांगांना घरे मिळाली नाही. घरकुलासाठी शासनाचे अनुदान कमी आहे. या अनुदानात घर बांधणे शक्य नाही. जिल्ह्यात घरकुलाचे उद्दिष्ठ वाढविण्यासोबतच अनुदानाच्या वाढीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कडू यांनी दिले.

 वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा जिल्हा आहे. गांधीजींनी या जिल्ह्यात मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील दिव्यांगांसाठी चांगले काम करावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. दिव्यांगांसाठी येत्या काळात जिल्ह्यात चांगले काम होईल. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, उपक्रमांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू असे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos