माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी साधला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांशी संवाद
- जवेली (बु.) येथील जि.प. शाळा व अंगणवाडीला भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या जवेली (बु.) येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देऊन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज्याच्या शेवटच्या टोकावर तसेच छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या जवेली (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावात भाग्यश्री आत्राम यांनी नुकतेच भेट दिली होती. या भेटीत त्यांनी नागरिकांशी संवाद साधत अडचण जाणून घेतली. या भागाचा दौरा करून परत येत असताना जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी त्यांना दिसले.
यावेळी त्यांनी आपले वाहन थांबवून शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधले. दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील भाग्यश्री सोबत हितगुज करत प्रशांची उत्तरे दिली. दुर्गम भाग असला तरी येथील १ ते ४ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न घाबरता अत्यंत मन मोकडेपणाने चर्चा करत गणवेश, शालेय पोषण आहार व शिक्षणाबाबत योग्य माहिती दिली. यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
एवढेच नव्हेतर विद्यार्थ्यांची केलेली बैठक व्यवस्था व शिस्त पाहून भाग्यश्री आत्राम यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनतर त्यांनी अंगणवाडीला भेट देऊन येथील गरोदर माता व चिमुकल्या बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराची माहिती घेतली.
यावेळी गावचे सरपंच दामजी रावजी हिचामी, उपसरपंच शाहू येसू पोटावी, जवेली (बु.) चे गाव पाटील तथा ग्रामसभा अध्यक्ष मुरा मनकु पोटावी, कन्हाळगावचे पाटील मनिराम नरोटे, कन्हाळगावचे ग्रामसभा अध्यक्ष ईश्वर नरोटे, ग्रामसभा सचिव नरेश परसा, कर्रेम गाव पाटील किशन इष्टम, ग्रामसभा अध्यक्ष माहू कोटामी, सचिव राजेश इष्टम, मेंढरी गाव पाटील वसंत नैताम, ग्रामसभा अध्यक्ष प्रसुर नैताम, सचिव संदीप नैताम तसेच येथील शिक्षक उपस्थित होते.
News - Gadchiroli