नागरिकांना पोषण आहार महिना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पोषण अभियानाच्या अंमलबजावणीकरीता समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. अंगणवाडीच्या सेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करण्यात येत असून या दरम्यान बाळाच्या जन्मानंतर पहिल्या ६ महिन्यापर्यंत केवळ स्तनपान व तद्नंतर पूरक पोषण आहार, स्वस्थ बालक स्पर्धा, पोषणाबरोबर शिक्षण, मिशन लाईफ अंतर्गत पोषण विषयक सुधारणा, मेरी माटीए मेरा देश, आदिवासी भागात पोषण विषय संवेदनशिलता वाढविणे, ॲनिमिया तपासणी, उपाय व जनजागृती या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधानाच्या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या विविध विभागामध्ये अभिसरण पध्दतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे. माहे सप्टेंबर हा महिना सही पोषण, देश रोशन पोषण महिना म्हणुन साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार यावर्षीच्या पोषण सप्ताहामध्ये सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आलेली आहे.
यासाठी ग्राम विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त यंत्रणा व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभागातून तालुका स्तर, ग्रामपंचायत स्तरावर सहभाग नोंदवून पोषण आहार महिन्यात प्रत्येक दिवशी घेण्यात येणारे कार्यक्रम, उपक्रमानुसार जिल्हा, प्रकल्प तसेच अंगणवाडी स्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे जनआंदोलन डॅशबोर्डवर दैनंदिन माहिती भरावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha