महत्वाच्या बातम्या

 सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा : आयुष्मान भव मोहीमेला १ सप्टेंबरपासून प्रारंभ


- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१  डिसेंबर या कालावधीत आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना आज जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेवती साबळे, डॉ.आसिफ इनामदार, डॉ. गणेश कांबळे, डॉ. संगीता इंदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विशेष मोहीमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपक्रम, मोहीमा राबविताना सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी यावेळी मोहीमेचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले. ‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजतागायत देशभरात २५ कोटी आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

आयुष्मान सभा या उपक्रमांतर्गत आयुष्मान कार्ड व आभा कार्डविषयी जनजागृती करणे, आरोग्यवर्धीनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्यमान मेळावा या उपक्रमाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धीनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटर स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (० ते १८ वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos