लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरक : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
- अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
- अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवळ एका विशिष्ट वर्गाला नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विचारांची व कार्यकर्तुत्वाची प्रेरणा घेऊन समाजाने मार्गक्रमण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मातंग चेतना परिषद विदर्भ प्रदेशाच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमीत्य १०३ विद्यार्थ्यांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुसद येथील प.पू. गजानंदजी माऊली, भागवताचार्य मनिषजी महाराज, वामन आमटे, गौरव गांजरे, योग नृत्य परिवाराचे अध्यक्ष गोपाल मुंदडा, सुरेश घोडके, राजेश आमटे, एड. आशिष मुंधडा उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठेंनी समाजासाठी अतिशय बिकट परिस्थीतीत काम केले. त्यांनी समाजाच्या व्यथा, वेदना आपल्या साहित्यात मांडल्या. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समाजासमोर येतात व त्यातून समाजाला व नविन पिढीला प्रेरणा मिळते, असेही मुनगंटीवार म्हणाले.
प्रास्ताविकातून वामन आमटे यांनी समाजाच्या अडचणी मांडून काही मागण्या केल्या. त्यावर ना. मुनगंटीवार यांनी समाजाच्या सर्व मागण्यांचा सहानूभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असा विश्वास दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे, मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला शासकीय मदत मिळावी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळावी, बॅंड पथकातील कलावंतांना मानधन मिळावे तसेच समाजातील प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शेती वाहण्यास मिळावी व समाजाला जागेसहीत एक समाजभवन मिळावे या मागण्यांचा समावेश होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, रमाई आवास योजनेअंतर्गत आपल्या समाजाला घरे मिळवून देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन तसेच शेतीऐवजी येणाऱ्या पिढीला स्कील डेव्हलपमेंटचे ट्रेनींग देवून लहान-लहान उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, बॅंड वाजविणाऱ्या कलाकारांना मानधन देण्यासंदर्भात योजनेत समावेश आहे कां याची चौकशी करून सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी करणार -
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे यासाठी मी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीणार व त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी याप्रसंगी घोषीत केले. अण्णा भाऊ साठेंच्या जीवनावर फक्त १२ दिवसात टपाल तिकीट प्रकाशित करण्यात माझा खारीचा वाटा होता, याचा मला अभिमान व आनंद आहे तसेच अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाल्यावर त्यांच्या जीवनाचा व साहित्याचा विस्तृत अभ्यास करण्याची संधी नवोदितांना मिळेल असा मला विश्वास आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
News - Chandrapur